धाराशिव : ई -पीक पाहणी नोंदीला तांत्रिक अडचणीचा खोडा , ॲप चालत नसल्याने शेतकरी हैराण -
धाराशिव /प्रतिनिधी रुपेश डोलारे : जिल्ह्यामध्ये मागील आठवडाभरापासून ई- पिक पाहणीचे ॲप चालत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.पिकविमा भरल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी ॲपद्वारे ई- पीक पेरा प्रत्यक्षात शेतात जाऊन ॲप वरून नोंदी करणे अनिवार्य केले आहे. मात्र मागील आठवड्यापासून हे ॲप ओपन होत नसून तसेच "क्षमस्व सर्वर कनेक्शन साठी विलंब होत आहे पुन्हा प्रयत्न करा " अशा अनेक तांत्रिक अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हातात मोबाईल घेऊन तास न तास शेतात फिरत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाले आहेत परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी कधी पावसाचा खंड अशा आपत्तीची खबरदारी म्हणून शेतकऱ्यांचा पिकविमा भरला आहे . परंतु मागील दोन वर्षापासून कृषी विभागाने ई पीक पाहणी अँप द्वारे पिकाची नोंद व फोटो अपलोड करणे अनिवार्य केले आहे. त्यातच ग्रामीण भागात इंटरनेटची नेटवर्क अत्यंत धीम्या गतीने काम करत असते, काही कालावधी पुरती ॲप सुरू झाले तर लगेच माहिती अपलोड होते तर कधी सर्वर डाऊन चा मेसेज येत आहे. त्यामुळे शेतीची कामे सोडून शेतकरी मोबाईल घेऊन शेत परिसरात फिरत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी ई पीक पाहणी करण्यासाठी धावाधाव करताना दिसत आहेत. वेळेत ई- पीक पाहणी न झाल्यास शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होऊन देखील पिक विमा कंपनीकडे दावा कसा करायचा? असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. एकंदरीत ई-पीक ॲपमधील तांत्रिक दोष दुरुस्त करून सुरळीत ॲप चालू करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
0 Comments