ऑनलाइन रम्मीच्या विळख्यातून अख्ख कुटुंब संपवलं — पत्नी व दोन वर्षाच्या मुलाला विष पाजुन स्वतः तरुणाची आत्महत्या
पोलीस अधीक्षक तत्काळ घटनस्थळी दाखल
धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव तालुक्यातील बावी या गावात एका 29 वर्षीय तरुणाने ऑनलाइन जुगारामुळे निर्माण झालेल्या कर्जबाजारीपणाच्या तणावातून स्वतःच्या पत्नी व दोन वर्षाच्या मुलाचा विष देऊन खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे
या घटनेची अधिक माहिती अशी की ,लक्ष्मण मारुती जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. तीन वर्षांपूर्वी त्याने तेजस्विनी या तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांच्या दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा होता. काही महिन्यांपासून लक्ष्मण ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमच्या आहारी गेला होता. खेळत खेळता त्याने लाखो रुपये गमावले. या आर्थिक नुकसानातून सावरण्यासाठी त्याने स्वतःची एक एकर जमीन आणि गावातील प्लॉट विकला. तरीही त्याचे कर्ज फिटले नाही. त्यामुळे तो सतत मानसिक तणावात राहत होता.
रविवारी रात्री त्याने पत्नी आणि मुलाला विष पाजून ठार मारले आणि त्यानंतर स्वतः घरात गळफास लावून जीवन संपवले. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचत दरवाजा फोडून आत जाऊन पाहणी केली असता तिघांचेही मृतदेह आढळले. पोलिसांनी तत्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरू केला.
या घटनेची माहिती मिळताच धाराशिवचे पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी केली. त्यांनी संबंधित पोलिसांना सखोल तपासाचे आदेश दिले असून, ऑनलाइन रम्मीमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व मानसिक परिणामांवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गावात राहणाऱ्या तरुणाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत असल्याचे अनेकांना माहित होते. तरीही स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत किंवा पोलिस बीट पातळीवर याकडे लक्ष देण्यात आले नाही. अशी शोकांतिका टाळता आली असती का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ही घटना केवळ एक कौटुंबिक दुर्दैवी प्रसंग नसून, समाजातील वाढते ऑनलाइन व्यसन, कर्ज व्यवस्थापनाचे अभाव, आणि मानसिक आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यांचे गंभीर लक्षण आहे. शासनाने डिजिटल गेमिंगवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पावले उचलावी, तसेच गावपातळीवर मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
जिल्ह्यात सुरु असणाऱ्या चक्री,ऑनलाईन रम्मी, मटका या अवैध धंद्याना बंद करावे म्हणून वारंवार समाज माध्यमांना आवाज उठवला पण गेंड्याची कातडी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नसल्यामुळेच आज बावी येथील लक्ष्मण मारुती जाधव या तरुणांला आपले कुटुंब संपवावे लागले वेळीच हे अवैध धंदे बंद झाले असते तर ही वेळ आली नसती अशी चर्चा आता जिल्हाभर होत आहे.
या प्रकरणात पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी तात्काळ हालचाल करून तपास सुरू केला असून, त्यांच्या सक्रिय नेतृत्वामुळे भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी काही ठोस उपाययोजना होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 Comments