Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमात जिल्हयातील शैक्षणिक संस्था व विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे|Educational institutions and students of the district should participate in the Maharashtra Student Innovation Challenge activity: Collector Dr. Sachin Ombase

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमात जिल्हयातील शैक्षणिक संस्था व विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

उस्मानाबाद,दि.१०: महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज" या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी नवउद्योजक व त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे तसेच या नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरवणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

                 प्रथम टप्प्यात राज्यातील महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इतर शैक्षणिक संस्थांची नोंदणी दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात येत आहे. त्यानंतर त्या संस्थेतील विद्यार्थी “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' मध्ये आपल्या नवसंकल्पनांचे ऑनलाईन पध्दतीने रजिस्ट्रेशन दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत करू शकतील. संस्थास्तरावर उत्तम दोन संकल्पनांची निवडही प्रथम टप्यात करण्यात येईल.

                या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्यात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या उत्तम दोन संकल्पनांमधून सर्वोत्कृष्ट 100 संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल. निवडलेल्या 100 नवउद्योजकांसाठी विशेष एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातून सर्वोत्कृष्ट 10 विजेते निवडले जातील. सर्वोत्कृष्ट 10 विजेत्यांमध्ये, 30 टक्के महिला, 50 टक्के औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी व One District One Product (ODOP) संबंधित नवसंकल्पनांना प्राधान्य असेल. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये बीज भांडवल देण्यात येणार आहे.

                या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील 10 अश्या एकूण 360 नवउद्योजकांना 12 महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम दिला जाणार असून इन्क्युबेशन प्रोग्रामनंतर या 360 नवसंकल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण करण्यात येणार असून यातून सर्वोत्कृष्ट 10 नवउद्योजकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बीज भांडवल देण्यात येणार आहे. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे शैक्षणिक संस्था व जिल्ह्यांना या उपक्रमाची व्याप्ती वाढवून राज्याची नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विशेष परितोषिकेही दिले जाणार आहेत. या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळ www.msins.in  अथवा स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या www.schemes.msins.in  या पोर्टलला भेट द्यावी.

                तरी या स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या माध्यमांतून जिल्हयातील सर्व महाविद्यालये, आयटीआय कॉलेजेस आणि त्या शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शासनाच्या या उपक्रमात सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.


                                 

Post a Comment

0 Comments