कळंब - लातूर रस्त्यावरील अपूर्ण कामांमुळे जीवितहानी; शिवसेना आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा

Hot Posts

6/recent/ticker-posts

कळंब - लातूर रस्त्यावरील अपूर्ण कामांमुळे जीवितहानी; शिवसेना आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा

कळंब - लातूर रस्त्यावरील अपूर्ण कामांमुळे जीवितहानी; शिवसेना आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा


धाराशिव प्रतिनिधी/रूपेश डोलारे  : कळंब - लातूर रस्त्यावरील अपूर्ण कामांमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा गट) आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून, तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम अपूर्ण असून, खडकी गावाजवळील अरुंद पुलावर अपघात होऊन प्रकाश महाजन आणि मंगेश महाजन या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिनांक १० मे २०२५ रोजी पोलीस अधिक्षकांना पत्र पाठवून संबंधित अभियंता व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याआधीही त्यांनी कार्यकारी अभियंता, लातूर आणि अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय मुंबई यांना पत्राद्वारे सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

  त्यानंतर कळंब शहरातील तरुण व्यापारी कै. रमेश होनराव यांचा करंजकल्ला गावाजवळील अरुंद वळणावर, चेतावणी फलक नसल्यामुळे दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. तसेच डिकसळ पाटी, त्रिवेदी कॉम्प्लेक्स, छत्रपती संभाजीराजे चौक या ठिकाणी नेहमीच मोठी वर्दळ असूनही गतिरोधक नसल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत.

  या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) स्टाईलने तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर तालुका प्रमुख सचिन काळे, माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, प्रा. डॉ. संजय कांबळे, प्रदीप मेटे, शहर प्रमुख विश्वजीत जाधव, युवासेना तालुका प्रमुख पंडित देशमुख, उपशहर प्रमुख निर्भय घुले, शाम खबाले, संतोष लांडगे, प्रा. दिलीप पाटील, गोविंद जोगदंड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


तालुका व्यापारी महासंघाचाही इशारा – रक्षाबंधनपूर्वी उपाययोजना करा.. 

तालुका व्यापारी महासंघ, कळंब यांनी देखील निवेदनाद्वारे प्रशासनास इशारा दिला आहे. रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा सणासुदीच्या काळात करंजकल्ला वळणावर आणखी एखाद्या बहिणीचा भाऊ अपघातात गमावू नये, यासाठी तातडीने खालील उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे: करंजकल्ला वळणावर स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक आणि दिव्यांची त्वरित व्यवस्था करावी, वळणाची रचना बदलून सुरक्षित वळण तयार करावे, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी स्थायी उपाययोजना कराव्यात, जर वरील मागण्या त्वरित पूर्ण करण्यात आल्या नाहीत, तर स्थानिक व्यापारी व नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष नंदकिशोर मोरे, शहराध्यक्ष मयूर रुणवाल, तालुका सचिव बालाजी बावळे यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments