सौरकृषी पंप योजनेच्या ऑनलाइन अर्जासाठी शेतकऱ्याची फरपट
धाराशिव: शेतकऱ्यांना शेतीला दिवसा सिंचन करता यावे ,शेतीला दिवसा पाणी देता यावे, , यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान कुसुम सोलार योजना सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सौर पंप दिले जातात .केंद्र आणि राज्य सरकार त्यासाठी अर्थसाह्य करते, मात्र आता या योजनेचा अर्ज ऑनलाईन भरताना शेतकऱ्याकडून चलन भरूनही अर्ज पुढे जात नसल्याने शेतकरी अर्ज भरण्यासाठी वारंवार चकरा मारताना दिसत आहेत. संबंधित वेबसाईट चालत नसल्याने शेतकऱ्याची मात्र या योजनेचे अर्ज भरताना दमछाक होत आहे.या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी शेतकरी बांधवातून होत आहे.
ज्या भागात महावितरण कडून अद्याप वीजपुरवठा पोचलेला नाही. अशा भागातील शेतकऱ्यांना शासनाकडून 90/95 टक्के अनुदानावर दिल्या जाणाऱ्या सौर कृषी पंपामुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध होत आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला कोटा दिला जातो. यात पात्र शेतकऱ्याकडून अर्ज स्वीकारण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने फी भरून अर्जाची स्वीकृती होत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन प्रणालीमध्ये शेतकऱ्याकडून फी स्वरूपात पैसे घेतले जातात. मात्र अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पुन्हा येतच नाहीत. त्यामुळे प्रयत्न करूनही हजारो शेतकरी अर्ज करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र ऊर्जा प्राधिकरणाच्या( महाऊर्जा) वतीने राज्यात महा कृषी ऊर्जा अभियान पंतप्रधान कुसुम सोलार योजनेचा पुढील टप्पा राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी खुल्या गटाला 90 तर, अनुसूचित जमातीसाठी 95 टक्के अनुदान देण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना महाऊर्जाच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. जिल्हा निहाय कोटा उपलब्ध करून दिला आहे. खुल्या गटासाठी तीन एचपी पंपासाठी 19 हजार 380, पाच एचपी पंपासाठी 26 हजार 975,तर साडेसात एचपी साठी 37 हजार 440 रुपये रक्कम भरावे लागेल. तसेच अनुसूचित जाती आणि जमातीसाठी तीन एचपी साठी 9 हजार 690, पाच एचपी साठी 13 हजार 488, साडेसात एचपी साठी 18 हजार 720 भरावी लागते.
एकंदरीत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नेटकेपीमध्ये शेतकऱ्यांना दररोज दिवस रात्र अर्जासाठी जगावे लागत आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या समस्या असल्याने आर्थिक नुकसानी सोबतच मानसिक त्रास ही सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मागील काही दिवसापासून हीच समस्या निर्माण होत आहे, मात्र यंत्रणे कडून यात कोणती दुरुस्ती यंत्रणेही केली नाही . त्यामुळे ही ऑनलाईन प्रक्रिया संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी शेतकरी बांधवातून होत आहे.
मागील काही दिवसापासून संगणक केंद्रात फेऱ्या मारणे सुरू आहे मात्र अर्ज नोंदणी होत नाही. दिवस-रात्र अर्ज भरण्यासाठी नेट कॅफेवर थांबावे लागत आहे याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तात्काळ तांत्रिक अडचणी दूर करून सुरळीत चालू ठेवावी.
रवी मोरे शेतकरी
0 Comments