प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा भरण्याची 31 जुलै अंतिम मुदत.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
उस्मानाबाद,दि.03 :- खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकरी नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिलेले आहेत.
चालू खरीप हंगामात पिक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 31 जुलै 2023 ही आहे. पिक विमा योजना ही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी पर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करण्याबाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे. जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के व नगदी पिकासाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आलेला असला तरी 2023-24 पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी प्रती अर्ज केवळ एक रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. तर शेतकरी हिस्यातील उर्वरीत पीक विमा हप्त्याची रक्कम राज्य शासन भरणार आहे. शेतकऱ्यांना ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे ते पीक शेतात पेरल्या बद्दलचे स्वयंघोषणापत्र, सात बारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रतिसह नजिकच्या बँकेत अथवा आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्ता भरुन पीक संरक्षित करावे.
पीक विमा योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी अधिक माहीतीसाठी PMFBY.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजिकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.
0 Comments