सैतानी कृत्याचा कळस! १३ महिन्यांच्या पुतणीची गळा आवळून हत्या; मृतदेहाचे सात तुकडे करून शेतात पुरला – तुळजापूर तालुका हादरला-
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गवळेवाडी शिवारात उघडकीस आलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अवघ्या १३ महिन्यांच्या निष्पाप बालिकेची तिच्याच सख्ख्या चुलत्याने गळा आवळून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे तुकडे करून शेतात पुरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाणे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.या घटनने परिसरात खळबळ उडाली असून तुळजापूर तालुका हादरला आहे. ही हृदयद्रावक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली असून, तामलवाडी पोलिसांनी नराधम चुलत्याला बेड्या ठोकल्या आहेत.
बेपत्ता तक्रारीपासून हत्येचा उलगडा
तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी येथील महादेव माने यांची १३ महिन्यांची मुलगी आराध्या २७ फेब्रुवारी रोजी पहाटे अचानक बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी वडिलांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, मुलगी बेपत्ता झालेल्या दिवशी तिचा चुलता शंकेश माने हा तिला घेऊन जाताना दिसला होता. संशयाच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
संशयातून जन्माला आलेले अमानुष कृत्य
आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार, मुलीची आई परपुरुषासोबत पळून गेल्याचा आणि ही मुलगी आपल्या भावाची नसल्याचा संशय त्याच्या मनात होता. या संशयातूनच २७ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.३० ते ५ दरम्यान त्याने बालिकेला घरातून उचलून शेतात नेले. तेथे तिचा गळा आवळून खून केला.यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाचे तुकडे करून ते एका पोत्यात भरले आणि शेतात पुरून टाकले.
तहसीलदारांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर
शनिवारी रात्री आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर रविवारी सकाळी तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. शेतात पुरलेले पोते बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी तुळजापूर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (खून) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची तत्पर कारवाई
या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी रितू खोखर (पोलीस अधीक्षक), शफाकत आमना (अपर पोलीस अधीक्षक) व डॉ. निलेश देशमुख (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.
पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर व त्यांच्या पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवत काही तासांत आरोपीला अटक केली. या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे.


0 Comments