बहिणीला कॉलेजला सोडायला गेलेल्या बहिण भावावर काळाचा घाला, दुचाकी- ट्रकच्या भीषण अपघातात बहिण भाऊ ठार-
लातूर प्रतिनिधी रुपेश डोलारे : लातुर महामार्गावर मंगळवारी (दि. ७) सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात सख्ख्या बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाघोली (ता. औसा) येथून बहिणीला कॉलेजला सोडण्यासाठी आणि काही खरेदीसाठी दुचाकीवरून आलेल्या या भावंडांना भरधाव बलोरो कार आणि ट्रकच्या अपघाताने चिरडले. अपघातानंतर दोन्ही वाहने फरार झाली असून, वाघोली गावावर शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ,प्रसाद पद्माकर शिंदे (वय २५) आणि त्याची लहान बहीण गायत्री पद्माकर शिंदे (वय १७) अशी मृत भावंडांची नावे आहेत. प्रसाद हा बहिण गायत्रीला (दयानंद महाविद्यालयाची विद्यार्थीनी) लातूर येथील कॉलेजला सोडण्यासाठी आणि औशातून खरेदी करण्यासाठी आपल्या दुचाकीवरून (एम एच २४ बी ०६५३) येत होता. औसा-लातूर महामार्गावरील एका साडीच्या दुकानाजवळ, प्रसाद आपल्या लेनमधून सरळ जात असताना, पाठीमागून भरधाव आलेल्या बलोरो कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर खाली कोसळले आणि त्याच वेळी बाजूने वेगाने जाणाऱ्या एका ट्रकच्या चाकाखाली आले. अपघाताची भीषणता इतकी होती की, दोघांच्याही डोक्याचा आणि छातीपासून वरील भागाचा चेंदामेंदा झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आई-वडिलांचा हंबरडा आणि शोकाकुल गावकरी
पद्माकर शिंदे यांच्या कुटुंबात प्रसाद आणि गायत्री अशी दोनच मुले होती. १२ वी पर्यंत शिकलेला प्रसाद वडिलांना दुध व्यवसायात मदत करत असे, तसेच लहान बहिणीला लातूरला शिकवत होता. मनमिळाऊ स्वभाव आणि शिक्षणाची गोडी असलेली गायत्री फॅशन डिझायनरच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. एकाच वेळी दोन पोटची मुले अपघातात गमावल्याचे पाहून आई-वडिलांनी रुग्णालयात हंबरडा फोडला. बहिणीवर जीवापाड प्रेम करणारा भाऊ शेवटपर्यंत तिच्यासोबतच राहिला. वाघोली गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात या दुर्दैवी घटनेने अश्रू अनावर झाले होते.

0 Comments