धाराशिव :ग्रामपंचायत निधी घोटाळा उघड: 40.55 लाखांचा अपहार; सरपंचसह तिघांवर गुन्हा दाखल-Fraud Case Crime Dharashiv District washi grampanchyat
धाराशिवला: जिल्ह्यातील वाशी तालुक्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला असून ग्रामपंचायत घाटपिंपरी येथील 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तब्बल ₹40,55,083 रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये अश्विनी विनोद सातपुते (सरपंच, ग्रामपंचायत पाटपिंपरी), अनिल राजाराम तुपेरे (ग्रामपंचायत अधिकारी, घाटपिंपरी) आणि मनोज पवार (प्रो. रेवा एंटरप्रायझेस, उस्मानाबाद) यांचा समावेश आहे.
फिर्यादी विलास श्रीधरराव माचवे (वय 53 वर्षे), विस्तार अधिकारी, पंचायत समिती वाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींनी दि. 06 मे 2024 ते 04 नोव्हेंबर 2025 या कालावधीत संगनमताने 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार करून स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप आहे.
या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 316(5), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तपासाची दिशा: पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून संबंधित व्यवहार, कागदपत्रे आणि निधीचा वापर याची चौकशी सुरू आहे. या घोटाळ्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास केला जात आहे.
स्थानिकांमध्ये संताप: ग्रामपंचायतीच्या विकासासाठी असलेला निधी अपहार झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणातील पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0 Comments