चिवरी परिसरात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम धोक्यात; सोयाबीन पिके करपण्याच्या मार्गावर -
चिवरी/ प्रतिनिधी-बिभिषन मिटकरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. खरीप पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, आता त्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच चिवरी परिसरात पावसाचे सातत्य राहिलेले नाही. अधूनमधून झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी शेतजमिनीची मशागत करून सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासह विविध पिकांची पेरणी केली. पावसाळा समाधानकारक राहील आणि पिकांना पुरेसा पाऊस मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून खरीप हंगामाची तयारी केली होती.
परिसरातील शेतकऱ्यांचा नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे मोठा कल आहे. कमी कालावधीत उत्पादन मिळण्याची अपेक्षा असल्याने यंदाही अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. बियाणे, खते, खुरपणी, तणनाशके तसेच कीड व रोग नियंत्रणासाठी फवारणी यावर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे.
सध्या सोयाबीन पिकाला फुलोरा आणि शेंगा लागण्याचा महत्त्वाचा कालावधी सुरू आहे. या अवस्थेत पिकाला जमिनीत पुरेसा ओलावा आणि पाण्याची आवश्यकता असते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी अनेक शिवारांमध्ये सोयाबीनची पाने वाळू लागली असून झाडांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे.
खरीप हंगामासाठी आधीच बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि मशागतीवर मोठा खर्च झालेला आहे. त्यातच पावसाने साथ न दिल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
येत्या दोन-तीन दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर चिवरी परिसरातील शेकडो हेक्टरवरील खरीप पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः सोयाबीन पिकाचे उत्पादन घटण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहे.

0 Comments