मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईकडे रवाना, आरक्षणासाठी हजारो मराठा आंदोलन सज्ज
जालना प्रतिनिधी रुपेश डोलारे: मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी मराठा आंदोलक अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जुन्नर, राजगुरु नगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर असा प्रवास करत हा मराठा मोर्चा 28 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार आहे. काहीवेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आंतरवाली सराटीच्या वेशीवरुन वडीगोद्री येथे पोहोचला. या मराठा मोर्चाचा आजचा मुक्काम जुन्नरमध्ये असेल.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून निघण्यापूर्वी मुंबईतील आझाद मैदानात दीर्घकाळ आमरण उपोषणाला बसावे लागेल, याची कल्पना मराठा आंदोलकांना दिली. ही आरपारची आणि शेवटची लढाई आहे. कितीही वेळ लागला तरी आपण मुंबई सोडायची नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक तब्बल महिनाभर मुंबईत राहावे लागेल, अशी तयारी करुन घराबाहेर पडले आहेत. मनोज जरंगे यांनी आवाहन केल्यानंतर राज्यभरातील गाव गाड्यांमधून मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईकडे निघाले आहेत.परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून विविध गाड्यांच्या माध्यमातून मराठा समाजबांधव, युवक हे मुंबईकडे निघाले आहेत. दोन महिन्याचा किराणा, गॅस शेगडी, भगुने व इतर साहित्य घेऊन हे मराठा बांधव मुंबईकडे निघाले आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार या मराठा बांधवांनी केला आहे.
मनोज जरांगे -पाटील काय म्हणाले?
आपण सगळे जण मुंबईच्या दिशेने लगेच निघायचं, थांबायचे नाही. आपण आझाद मैदानावर कायद्याच्या कक्षेत राहून आंदोलन करायचे आहे. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु होईल. आपल्याला उचकण्याचा प्रयत्न केला जाईल, खुनशी वागणूक दिली जाईल, पण शांत डोक्याने राहायचं. आता आरपारची शेवटची लढाई आहे, दम धरुन बाजी जिंकू शकतो. कितीही दिवस लागू दे, पण संयम सोडू नका. अशी लढाई कधी जगाच्या पाठीवर झाली नसेल इतक्या डोक्याने ही लढाई जिंकायची आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना सांगितले.

0 Comments