धाराशिव :भाटशिरपुरा येथे १२ वर्षीय मुलाचे अपहरण; शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-Kidnapping News Dharashiv Crime
धाराशिव : कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथे एका १२ वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बबलु रामभवन राय (वय ३७) हे मूळचे बिहार राज्यातील पटना जिल्ह्यातील दुधैला मनेरणा येथील रहिवासी असून सध्या कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा करणकुमार बबलु राय (वय १२) हा १४ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास गावातील दिनेश सुर्यकांत वाघमारे यांच्या घराजवळून अचानक बेपत्ता झाला.
अज्ञात व्यक्तीने करणकुमार याला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मुलगा अचानक गायब झाल्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र त्याचा काहीच मागमूस लागला नाही. त्यामुळे अखेर वडील बबलु राय यांनी १५ मार्च २०२६ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, घटनेमुळे भाटशिरपुरा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

0 Comments