उमरगा (चि.) केंद्राचा राज्यस्तरीय संविधान गुण गौरव परीक्षेत दैदिप्यमान यश;ज्ञानेश्वरी जाधव हिचा प्रथम क्रमांक-जिल्हास्तरावर आ. स्वामी यांच्या हस्ते गौरव-Latest Update
इटकळ (दिनेश सलगरे): भारतीय राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संविधान गुण गौरव परीक्षा २०२५-२०२६ मध्ये उमरगा (चि.) केंद्राने उज्ज्वल यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. जि.प. प्रा. शाळा उमरगा (चि.) येथे घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय परीक्षेत इयत्ता सहावीतील कु. ज्ञानेश्वरी एकनाथ जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावत शाळेचा आणि परिसराचा मान उंचावला.
या स्पर्धात्मक परीक्षेसाठी एकूण २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक: ज्ञानेश्वरी एकनाथ जाधव (इयत्ता ६ वी)
द्वितीय क्रमांक: प्रगती अण्णाराव कदम (इयत्ता ७ वी)
तृतीय क्रमांक: आयान अझरोद्दीन पिंजारी (इयत्ता ७ वी)
यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरावर प्रवीण स्वामी यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.
संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय राज्यघटनेबद्दल जागरूकता निर्माण होणे, संविधानातील मूल्यांची जपणूक करणे तसेच लोकशाही तत्त्वांची सखोल समज वाढविणे हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री. कांबळे एस. एस. यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षक श्री. सालेगावकर एम. पी., श्री. स्वामी एस. एस., श्री. पोतदार सर, श्री. काळे सर, श्री. राजगुरु सर, श्री. राठोड सर आणि श्री. कोरे सर यांचे परिश्रम मोलाचे ठरले. शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढवला.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे उमरगा (चि.) केंद्राचा शैक्षणिक दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून परिसरात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. आगामी काळातही अशाच प्रकारे शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन अधिकाधिक यश संपादन करण्याचा निर्धार शाळा परिवाराने व्यक्त केला आहे.
0 Comments