धक्कादायक घटना : धाराशिव जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलाचे अपहरण, तुळजापूर येथून १७ वर्षीय मुलाचे अपहरण तर कोरेगाव येथील आश्रम शाळेतील ९ वर्षीय विद्यार्थ्यांचे अपहरण-पोलीसांत गुन्हा दाखल- Two Boys Kidnapping Case Dharashiv District

तुळजापूरमध्ये १७ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
धाराशिव-प्रतिनिधी : तुळजापूर शहरातील एस.टी. कॉलनी परिसरातून १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी संतोष दत्तात्रय जोशी (वय ५५ वर्षे, रा. एस.टी. कॉलनी, तुळजापूर) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांचा मुलगा समर्थ संतोष जोशी (वय १७ वर्षे) याला दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे. मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी त्याचा परिसरात शोध घेतला; मात्र तो आढळून आला नाही.
यानंतर संतोष जोशी यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत असून मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी चौकशी सुरू आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आश्रमशाळेतील 9 वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण; उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल
धाराशिव जिल्ह्यातील दुसऱ्या घटनेत उमरगा तालुक्यातील कोरेगाव येथील माउली आश्रमशाळेच्या वसतिगृहातील 9 वर्षीय विद्यार्थ्याचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून मुलाचा शोध सुरू आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी उत्तम माधवराव कांबळे (वय 56 वर्षे) हे माउली आश्रमशाळा, कोरेगाव (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथील वस्तीगृह अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते मूळचे लोहारा (ता. उदगीर) येथील रहिवासी असून सध्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहतात.
वसतिगृहात राहणारा युवराज अनिल राठोड (वय 9 वर्षे, रा. लोहारा खुं. तांडा, ता. लोहारा) हा विद्यार्थी दि. 8 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 4 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान अचानक बेपत्ता झाला. त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या घटनेनंतर वसतिगृह प्रशासनाने व परिसरात शोध घेतला; मात्र मुलाचा काहीही मागमूस लागला नाही. त्यामुळे वस्तीगृह अधीक्षक उत्तम कांबळे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीच्या प्रथम खबरेवरून उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम 137 (2) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, तसेच संशयित व्यक्तींची चौकशी सुरू केली असून मुलाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.या घटनेचा अधिक तपास उमरगा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

0 Comments