🌩️ ऐन कापणी हंगामात गारपीट-वादळाचा इशारा; शेतकऱ्यांनी सतर्क राहावे – कृषी विभागाचे आवाहन#weather alert# IMD Alertन
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात ऐन रब्बी पिकांच्या कापणीचा हंगाम सुरू असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीट संकट उभे ठाकले आहे. 30 ते 31 मार्च दरम्यान राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, शेतकऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः कर्नाटक व तेलंगणा सीमेलगतच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील सीमावर्ती भागांना या बदलत्या हवामानाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
या कालावधीत विजांचा कडकडाट, सोसाट्याचे वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 30 मार्चप्रमाणेच 31 मार्च रोजीदेखील काही भागांमध्ये अशाच प्रकारचे हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, 31 मार्च 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तर बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून, या भागांमध्ये विजांचा कडकडाट, मेघगर्जना, ताशी 50 ते 60 किमी वेगाचे वादळी वारे आणि तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनालाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून नदीकाठच्या गावांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक असल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
तसेच पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


0 Comments