यंदा ऊस गाळप हंगामात परतीच्या पावसाचा अडथळा, शेतकऱ्याची घालमेल वाढणार
तुळजापुर/बालाघाट न्युज टाइम्स: उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मागील पाच-सहा दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे सर्वत्र खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, त्याचबरोबर यंदाचा ऊस गाळप हंगामही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. येत्या १५ आक्टोंबर पासून यावर्षीचा गाळप हंगाम सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मात्र महाराष्ट्रभर पुन्हा एकदा परतीच्या पावसाने पुनरागमन केले आहे. यामुळे उसाच्या फडात पाणी आणि चिखल सर्वत्र झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत ऊस कारखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी अडथळ्याची शर्यत पार करावी लागणार आहे. तर दुसरीकडे यावर्षी मान्सूनचा मुक्काम वाढणार असल्याचे शक्यताही वर्तवली जात आहे. यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत असताना दिसत आहेत, अशातच लंपी स्क्रीनच्या प्रादुर्भावामुळे जनावरांच्या वाहतुकीला निर्बंध देखील घालण्यात आले आहेत त्यामुळे यावर्षीचा चालू गळीत हंगाम आव्हानात्मक ठरण्याचीच चिन्हे अधिक आहेत. सध्या गावोगावी ऊस तोडणी कामगार दाखल होऊ लागले आहेत, मात्र परतीच्या पाऊस सर्वत्र धुमाकूळ घालत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे परतीचा पाऊस ऑक्टोंबर अखेरपर्यंत पडत राहिला तर हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
0 Comments