धाराशिव: प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!— पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाम इशारा-Pratap Sarnaik Dharashiv Palakmantri
धाराशिव (३ मार्च) — जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. “सत्ता महत्त्वाची असली, तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची आहे. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
नुकत्याच झालेल्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र लढवल्या होत्या. पुढील सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू असतानाच, काही मंडळींकडून माध्यमांमध्ये दिशाभूल करणाऱ्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. “स्वार्थी राजकारणातून शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत असल्याचा प्रचार करून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
आमदार तानाजी सावंत यांना वेगळे ठेवून मतभेद असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “आमचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अखंड, अभेद्य आणि सशक्त आहे. कोणत्याही अफवांना आम्ही बळी पडणार नाही,” असे ते म्हणाले.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनिता पवार यांच्याशी चर्चा करून पुढील राजकीय रणनीती ठरवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तथाकथित स्वयंघोषित नेत्यांनी पक्षाच्या रणनीतीबाबत सार्वजनिक भाष्य करू नये, अशा सक्त सूचनाही त्यांनी दिल्या.
“सत्ता हे ध्येय असले तरी तत्त्वांशी तडजोड नाही. दबाव, आमिष किंवा अफवांच्या आधारे शिवसेनेची एकजूट ढळणार नाही,” असा विश्वास व्यक्त करत सरनाईक यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल, त्या निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून संघटन अधिक बळकट करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आगामी राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना अधिक सक्षम आणि संघटितपणे उभी राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

0 Comments