धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; अर्चना पाटील अध्यक्षपदी,तर उपाध्यक्ष पदी उषाताई गायकवाड यांची निवड भाजप ठरला क्रमांक एक पक्ष-

धाराशिव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीने दमदार कामगिरी करत जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने संघटनबळाच्या जोरावर निवडणूक लढवत सर्वाधिक जागा मिळवल्या. या विजयामुळे जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन झाली असून भाजपच्या अर्चना पाटील यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकत भारतीय जनता पार्टी हा जिल्ह्यातील क्रमांक एक पक्ष ठरला असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले. नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरही पक्षाला मिळालेले यश हे जनतेने विकासाच्या राजकारणाला दिलेला कौल असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपने राबवलेल्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी, जनतेशी सातत्याने ठेवलेला संपर्क आणि पक्षाच्या नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेला विश्वास यामुळे जिल्ह्यात पक्षाला व्यापक प्रतिसाद मिळाला असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. या विश्वासाच्या बळावर जिल्ह्यातील जनतेने भाजपला मोठ्या प्रमाणात स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी संघटन बळकट करण्यासाठी घेतलेले परिश्रम, गावोगावी उभे राहिलेले कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि नियोजनबद्ध निवडणूक यंत्रणा यामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे जिल्हा परिषदेत पक्षाच्या नेतृत्वाला मिळालेली संधी ही संघटनशक्तीचीच पावती असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, शेतकरी, महिला आणि युवकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
नगरपालिका ते जिल्हा परिषद असा मिळालेला विजय हा कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचा आणि जनतेच्या विश्वासाचा परिणाम असून, जनतेने दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.


0 Comments