जि.प. निवडणुकीच्या वैमनस्यातून ईट येथे प्राणघातक हल्ला; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल-धाराशिव जिल्हातील घटना -Dharashiv District Incident in Attempt of Murder
धाराशिव : प्रतिनिधी
जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाचे वैमनस्य मनात धरून ईट येथील नागेवाडी चौकात एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात ११ जणांसह इतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिल पोपटराव देशमुख (वय ४६, रा. ईट ता. भुम जि. धाराशिव) हे दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९.०० वाजण्याच्या सुमारास ईट येथील नागेवाडी चौकात असताना आरोपींनी त्यांना अडवले. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा पराभव झाल्याचा राग मनात ठेवून आरोपींनी एकत्र येत शिवीगाळ करत हल्ला चढवला.
या हल्ल्यात आरोपी ज्ञानेश्वर सोपान गिते, बाळासाहेब बब्रुवान लिमकर, अशोक चव्हाण, प्रमोद गिरी, सुनिल नलवडे, संभाजी नलवडे, भास्कर लिमकर, अविनाश अनभुले, निवृत्ती तावरे, विलास खोसे (सर्व रा. आंद्रुड ता. भुम) तसेच इतर दोन इसमांचा समावेश असून त्यांनी लाथाबुक्यांसह लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण करून देशमुख यांना गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर जखमी देशमुख यांनी २५ एप्रिल रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), ११५(२), ११८(१), ३५२, १९०, १८९(२), १९१(२)(३), १२६(२), ३५१(२)(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करत असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. स्थानिक परिसरात या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 Comments