नांदेडमध्ये हृदयद्रावक दुर्घटना; खड्ड्यात बुडून चार चिमुकल्यांचा मृत्यू – दोन सख्ख्या भावांचा समावेश-Nanded News
नांदेड : शाळा सुटल्यानंतर घरी परतताना पोहण्यासाठी खड्ड्यात उतरलेल्या चार अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील इस्लामपुरा भागात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दिनांक १६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर मोहम्मद अली मोहम्मद इदरीस (वय १३), सय्यद इरफान सय्यद फिरोज (वय १३), मोहम्मद अदमान मोहम्मद फिरोज आणि आयान इब्राहिम बागवान ही चार मुले इस्लामपुरा परिसरात खेळत होती. उष्णतेमुळे त्यांनी जवळच असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाण्याची खोली आणि खड्ड्यातील गाळाचा अंदाज न आल्याने एकामागोमाग एक सर्वच मुले बुडाली.
या चारही मुलांपैकी सय्यद इरफान आणि मोहम्मद अदमान हे सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. तसेच पोलीस अधीक्षक प्रशांत शिंदे, इतवारा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि जीव रक्षक पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने मुलांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सुरक्षेअभावी संताप, कारवाईची मागणी
या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिकेकडून खाजगी कंत्राटदारामार्फत नाल्याचे काम सुरू होते. नियमानुसार अशा ठिकाणी सुरक्षारक्षक, कुंपण किंवा धोक्याचे इशारे देणारे फलक लावणे आवश्यक असताना येथे कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. त्यामुळे हा निष्काळजीपणा चार निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
बेकायदेशीर कामामुळे तयार झाला डोह
स्थानिकांच्या माहितीनुसार, एका खाजगी प्लॉटिंग मालकाने रात्रीतून बेकायदेशीरपणे मुरूम टाकून भराव केला होता. त्यामुळे नाल्याचे पाणी अडले आणि त्या ठिकाणी मोठा डोह तयार झाला. हाच डोह चार मुलांच्या जीवावर बेतल्याचे सांगितले जात आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे नांदेड शहर हादरले असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मृत मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

0 Comments