बार्शी: - मित्राला पोलिसांत तक्रार देण्यास सांगितल्याचा राग; वैरागमध्ये तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या-solapur Crime News Update
सोलापुर /प्रतिनिधी : मित्राला पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिल्याचा राग मनात धरून एका ३१ वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना वैराग शहरातील दत्तनगर परिसरात उघडकीस आली आहे. शनिवारी (२ मे) पहाटेच्या सुमारास ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव दिनेश ऊर्फ आप्पासाहेब दादासाहेब कापसे (वय ३१, रा. दत्तनगर, वैराग) असे असून, या प्रकरणी त्याचा भाऊ ज्ञानेश्वर कापसे यांच्या फिर्यादीवरून वैराग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वादातून घेतला जीव
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या आदल्या दिवशी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास काही मित्र दुकानाजवळ बसून मद्यपान करत होते. यावेळी आरोपी उल्हास ऊर्फ बबलू दत्तात्रय मुळे (वय ३२) आणि दिनेश संतोष चव्हाण यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादात आरोपीने लोखंडी हुकने चव्हाणच्या हातावर वार करून त्याला जखमी केले.
हा प्रकार पाहून मयत दिनेश कापसे यांनी जखमी मित्राला पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला. याच कारणावरून आरोपीच्या मनात कापसे याच्याविषयी राग निर्माण झाला. ‘तुला बघून घेतो’ अशी धमकीही आरोपीने दिली होती.
घरी सोडण्याच्या बहाण्याने नेले आणि केला खून
वादानंतर काही वेळाने आरोपी उल्हास मुळे याने दिनेश कापसे याला मोटारसायकलवरून घरी सोडण्याचा बहाणा केला. मात्र त्याला थेट दत्तनगर येथील नवीन मराठी शाळेच्या मैदानावर नेण्यात आले. तिथे संतापाच्या भरात आरोपीने मोठ्या दगडाने दिनेशच्या डोक्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या केली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले आढळून आले.
आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेनंतर आरोपी उल्हास मुळे फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
या थरारक हत्याकांडामुळे वैराग शहरासह दत्तनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

0 Comments