रब्बी हंगामावर गारपीटीचे संकट! १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जना, वादळी वारे व गारपीटीची शक्यता; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना इशारा-Weather Farmers Alerts News
मुंबई : महाराष्ट्र राज्यात सध्या रब्बी पिकांच्या कापणीचा हंगाम सुरू असतानाच शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे संकट उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कापणी केलेली पिके सुरक्षित ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.
भारतीय हवामान विभाग यांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील काही भागात 17 मार्च ते 20 मार्च दरम्यान वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः दुपारनंतर आभाळ दाटून येणे, मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हा संभाव्य पाऊस व गारपीट विशेषतः पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्र या भागातील काही जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. यामध्ये खानदेश भागात गारपीटीचा फटका बसण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
या कालावधीत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि गारपीटीसह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. रब्बी हंगामातील कापणी केलेली पिके शेतात उघड्यावर ठेवू नयेत, ती सुरक्षित ठिकाणी साठवून त्यावर ताडपत्री किंवा प्लास्टिकने झाकून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच शेतकऱ्यांनी या संभाव्य हवामान बदलाचा विचार करून शेतीच्या कामांचे नियोजन करावे, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान हवामानाचा सुधारित अंदाज 15 ते 16 मार्च दरम्यान जाहीर होणार असून शेतकऱ्यांनी त्याकडेही लक्ष ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.


0 Comments