बारुळ पाटीजवळ भीषण अपघात – ट्रकच्या निष्काळजी वळणामुळे दोन जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी-Accident News
तुळजापूर, दि. ७ : तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नळदुर्ग ते तुळजापूर जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर बारुळ पाटी येथे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दि. 13 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी फिर्यादी अभिजीतसिंह रणजितसिंह ठाकुर (वय 35, रा. बालाजी नगर, उमरगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी फोरव्हीलर गाडीतून प्रवास करत असताना बारुळ पाटीजवळ समोरून येणाऱ्या ट्रक (क्र. एमएच 09 ईएम 6597) चालकाने अत्यंत निष्काळजीपणे व वेगात गाडी चालवत कोणताही इंडिकेटर किंवा सिग्नल न देता अचानक उजवीकडे वळण घेतले. यामुळे फिर्यादींच्या गाडीची ट्रकच्या डाव्या बाजूस जोरदार धडक बसली.
या भीषण धडकेत कृष्णाजी अशोक माने (वय 32, रा. गुंजोटी) व प्रशांत तानाजी भोसले (वय 42, रा. तुळजापूर) हे दोघे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडले. तर अभिजीतसिंह ठाकुर व संतोष दत्तात्रय म्हेत्रे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताचे मुख्य कारण ट्रक चालकाची निष्काळजी व बेदरकार वाहनचालकता असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, फिर्यादी अभिजीतसिंह ठाकुर यांनी दि. 7 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 281, 125(अ), 125(ब), 106 तसेच मोटार वाहन कायद्यान्वये कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

0 Comments