धाराशिव जिल्ह्यात शेतीच्या वादातून दोन ठिकाणी तुफान हाणामारी; अनेक जखमी, गुन्हे दाखल-Dharashiv Crime News Live Update
धाराशिव, दि. ३० मे: जिल्ह्यात शेतीच्या वादातून हिंसक घटनांचे प्रमाण वाढत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. वाशी तालुक्यातील बावी आणि कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथे शेतीच्या कारणावरून झालेल्या दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटनांमध्ये अनेक जण जखमी झाले असून संबंधित आरोपींविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे नोंदविले आहेत.
बावी शिवारात मशागतीच्या कारणावरून वृद्धासह नातेवाईकांना मारहाण
येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावी शिवारात शेत मशागतीच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानदेव सुखदेव शिंदे (वय ७५, रा. बावी, ता. वाशी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २१ मे रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास शेत गट क्रमांक ६४९ मध्ये आरोपी उत्रेश्वर गोरख कवडे व इटकुर येथील त्याचे तीन अनोळखी नातेवाईक यांनी फिर्यादींचे पुतणे विजयसिंह शिंदे आणि भावजय सुकन्या यांच्यासह फिर्यादींना शिवीगाळ केली.
त्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ज्ञानदेव शिंदे यांनी २८ मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११७(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाटशिरपुरा येथे धारदार शस्त्र, काठी व दगडाने हल्ला; सोन्याची अंगठीही हिसकावली
दुसरी घटना कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथे घडली. शिराढोण पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत अनेक जण जखमी झाले असून एका तरुणाच्या हातातील सोन्याची अंगठीही हिसकावून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादी दिलीप नामदेव वाघमारे (वय ५१, रा. भाटशिरपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २७ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी नेताजी शिवाजी वाघमारे, तानाजी शिवाजी वाघमारे, गणेश तानाजी वाघमारे, रविराज नेताजी वाघमारे, प्रेमराज नेताजी वाघमारे, भाग्यश्री नेताजी वाघमारे आणि गंगाबाई तानाजी वाघमारे यांनी शेतीच्या वादाच्या कारणावरून गैरकायदेशीर जमाव जमविला.
आरोपींनी फिर्यादी, त्यांची पत्नी सुनिता तसेच मुले सुहास व श्रीनिवास यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, धारदार शस्त्र, काठी आणि दगडाने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याचा आरोप असून, मुलगा सुहास याच्या हातातील सुमारे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठीही आरोपींनी काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ११९(१), ३५१(२), १८९(२), १९०, १९१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

0 Comments