शेतकऱ्यावर काळाचा घाला! शेतात मशागत करताना ट्रॅक्टर उलटून ३४ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ६ महिन्यांच्या बाळासह पाच मुले पोरकी-धाराशिव जिल्हातील घटना -Dharashiv District Accident News
धाराशिव : भूम तालुक्यातील वाकवड येथे शेतीची मशागत करत असताना झालेल्या भीषण अपघातात एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकवड फाट्याजवळील शेतात शनिवारी (दि. १३) दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास सुरेश रोहिदास अर्जुन (वय ३४) हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करत होते. काम सुरू असताना ट्रॅक्टर वळवण्याच्या प्रयत्नात अचानक एका बाजूचे चाक तालीच्या खाली गेल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले.
नियंत्रण सुटताच एमएच-२५ बीएफ-०२८६ क्रमांकाचा ट्रॅक्टर तब्बल तीन पलट्या खात पुन्हा सरळ उभा राहिला. मात्र या अपघातात सुरेश अर्जुन हे ट्रॅक्टरखाली चेंगरले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी शेतात त्यांच्या जवळ कोणीही नसल्याने मदत मिळू शकली नाही. दूरवरून एका महिलेने हा अपघात पाहिल्यानंतर तातडीने कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीय घटनास्थळी धावून आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
या दुर्दैवी घटनेमुळे घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. सुरेश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुली आणि दोन मुले, त्यामध्ये अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश असून संपूर्ण कुटुंब पितृछत्राला मुकले आहे.
या घटनेनंतर वाकवडसह परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून कुटुंबाला आधार देण्याची भावना व्यक्त केली जात आ हे.

0 Comments